Tuesday, August 3, 2010

सात ...

या विषयावर आजपर्यंत खुप जणांनी लिहीलेय, खुप सुंदर लिहीलेय. त्या सात महावीरांची
आठवण आजही आपल्याला निष्ठेचे महत्व शिकवते. आपल्या राजाची मर्जी राखण्यासाठी
प्राणाचीही पर्वा न करता शत्रुवर तुटून पडणार्‍या सरसेनापती प्रतापराव उर्फ कुडतोजी गुर्जर आणि त्यांच्या त्या सहा अनाम सरदारांना माझा त्रिवार मुजरा !

जाहली चुक, क्षुब्ध राणा हे पाप घडले कसे ?
टाकली मांड झणी, झळके तेग तेज मावळी
शिणवट्याचे नुरले भान, घ्यावया प्राण शत्रुचे
तमा नसे मृत्युची, रायाची अपमर्जी जाहली
………… तो एकच अमुचा देव करु कसा राजी?

यल्गार जाहला, फडकले निशाण रणरागाचे
दिग्मुढ झाला अरि, उसळले अश्व रणवीरांचे
कशी जाहली गफलत दुखावले आमचे धनी
आता विजय अंती…, वा पडेल मस्तक रणी
…………मारु अथवा मरु हा अट्टाहास तो मनी !

लागले वेड सुडाचे, गनिम तो जळी-स्थळी
राहील रिते म्यान जोवरी मिळे शत्रुचा बळी
ना बळ सेनेचे सवे, ना तय्यारी हत्यारांची
जिवे मारुन गनिमास..,दाखवु तोंड रायास
…………मरणातेही जिंकु ही जिद्द एक ती उरी !

लाजली वीज, झळकले तेज वीरांचे रणांगणी..
उसळले मेघ, कडाडे तेज, गनिमास भरे कापरे
दरारा मृत्यूसही तयांचा, काळ स्तब्ध त्या क्षणी
वणव्यात तळपली ज्योत, समशेर नभातुन फिरे
……..अमर जाहले सात, उधळीले प्राण त्वये झणी !

कळता वार्ता बलिदानाची, सुन्न जाहले स्वराज्य
नमला माथा, पडले खांदे , पाणावले नेत्र शिवबाचे
कसे स्वराज्या खांब लाभले, ते महावीर बलिदानी
हि वेडी निष्ठा मम सावल्यांची, श्वास कोंडले आमचे
………..पराक्रमाची शर्थ जाहली, स्मरण सप्त-सुर्यांचे मनी!

विशाल.

2 comments: