Tuesday, July 27, 2010

ठसे…

  सुख माझे कसे, मला महाग झाले
सोसवेना विरह हा, मन पिसे झाले

जपले आजवरी मी, गे कसे हरवले
अश्रु आज माझे, शुष्क कसे झाले

वेदना मनीची नच, जाणिली कुणी
भावनांचे आज, माझ्या हंसे झाले

डोळ्यात साठलेले, प्रेम लुप्त झाले
तुझे टाळणे मला, नित्य असे झाले

आता आठवांचेही, वार दुधारी झाले
शब्दांवर वेदनांचे, विकल ठसे झाले

विशाल

तक्रार…

सखे मी शोधीतो तुझाच चंद्र कधीचा
पाणावले नयन दर्शना तरसले

का चांदणे सदा बरसले तुजवरी
बरसताना कसे मलाच विसरले

मोहरला देह ओलावली काया तुझी
वाटेवरुन माझ्या मेघही परतले

सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदु
क्षितीजावरले माझ्या धृवही सरकले

थांबली पुनव, सखे तुज स्वागता
स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले

विशाल

स्वर्ग…

 
आज मंद वार्‍यातुनी वाजते बासरी
सख्या हाय गात्रांतुनी धुंद ही शिरशिरी

निरवताही डोलते वारियाच्या सवे
तुझ्या स्वरांसवे धरा छेडिते सतारी

रंग सृष्टीचे बघ जाहले कृष्ण निळे
अन व्योमात सामावूनी उरला श्रीहरी

हरिच्या सुरांतुनी मनी प्रित झिरपते
तयांसवे डोलते मुग्ध राधिका लाजरी

खुळावल्या गोपिका रास वृंदावनी
जिभ वेडावूनी बघ चिडवितो मुरारी

अंतर गगनधरेतले गेले विरघूनी
चांदण्यात अवतरे स्वर्ग यमुनातीरी

विशाल

भूल…

खुळावले नयन, झाले धूंद
सख्या हळुवार तुझी चाहूल

संपले अवचित सारे भास
मनाला पडली कसली भूल

स्तब्ध जाहला, अवखळ वारा
वाजता तुझे नि:शब्द पाऊल

पाचोळ्याचा अन नाद देतसे
बघ उगा तुझ्या येण्याची हूल

विसरले श्वास, तुझाच ध्यास
तु असा कसा रे उंबर फूल

पांघरलेली गात्रांवर ओली
खुळावल्या दंवबिंदुंची झूल

विशाल

बाकी ते रुसणेच खरे….!

 तुझे ते लाजणे गालात
आठविता गं रात्र सरे

शब्द ओलावणे ओठात
स्मरण्यां दिवस ना पुरे

तु नसशी कवेत आता
बघ अशांत मन झुरे

बांध वेदनांचा तुटेना
शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे

मन विसरु पाही तुला
मज सुन्न एकांत सावरे

पुन्हा डोकावणे स्वप्नात
जखमांचे ते भान ना उरे

अन थांबलेले डोळ्यात
आसवांचे वाहते झरे

लटके ओशाळणे तुझे
बाकी ते रुसणेच खरे

विशाल

दादा म्हनले ….. !

दादा म्हनले
आंदोलन करा
आमी बशी जाळ्ळ्या…

दादा म्हनले
चळवळ करा
आमी दुकानं फोळ्ळी…

दादा म्हनले
सत्याग्रेव करा
आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी…

दादा म्हनले
त्यो लै बोलतुया
तेची जीभ तोळ्ळी …

दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो………….?

विशाल

आता नको…

भावनांचे पसारे खुप झाले
हे असे वेडावणे आता नको … !

वळणावर त्या रेंगाळलेल्या
आठवांची साथ आता नको … !

हृदयात तू कोंडलेल्या सखे
सुखांचा गुदमर आता नको … !

चल सखे स्वप्न स्वप्न खेळु
वास्तवाचा धाक आता नको … !

हरवले स्वर ते सारे आता
हुरहुर मारव्याची आता नको … !

त्या तिथे पलिकडे .., ते चित्र
फसव्या सुखाचे आता नको … !

चल सखे पैलतीरी जावू
मोह ऐलतीराचा आता नको … !

विशाल

चित्कला

आदिमाया ती आदिशक्ती
स्वयें चित्कला मायमुक्ती

ज्ञानराज सोपान मुक्तीचा
साधन ते अवघे निवृत्ती

मन मारुनी उन्मन करावे
ज्ञानराया शिकवली युक्ती

त्याग मायेचा मार्ग प्रभुचा
मिटविली चांग्याची भ्रांती

अहं नाम्याचा कच्चे मडके
गोरा म्हणे ती स्वयं भक्ती

क्लेश साहुनी क्षमा करावी
मुक्ती म्हणे मग मिळे शांती

नभात तेजें ज्योत उजळली
माय चित्कला मुक्त जाहली

या गाण्याला श्री. प्रमोदकाकांनी लावलेली चाल इथे ऐकता येइल..




विशाल

सय…

जोडली नाती कशी मी
आठवणे आज नाही !

तोडले कां पाश सारे
साठले ते घाव काही !

सोडला तो गाव तुझा
आसवांचा ठाव नाही !

आठवांची राख झाली
दाटलेले भाव काही !

चांदण्यांची याद ओली
शापितांचा चंद्र नाही !

मानसी आकांत चाले
तुंबलेले बांध काही !

विशाल

शक्ती…

तू माता, तूच कन्या
तू कांता सहचरी ..!

तू पृथा, तूच रसा
तू गंगा भागिरथी ..!

तू गऊ, तूच नंदिनी
तू काली संकटहारिणी ..!

तू दुर्गा, तूच कमला
तू माया आदिशक्ती ..!

तू ऋद्धी, तूच सिद्धी
तू विद्या माय सरस्वती ..!

तू स्नेह, तूच कारुण्य
तू तडिता सौदामिनी ..!

तू जिजाऊ, तूच लक्ष्मी
तू महिषासुर मर्दिनी ..!

तू भक्ती, तूच शक्ती
तू वात्सल्य ममतामयी ..!

तू तेज, तूचि सामर्थ्य
तू पावित्र्य मांगल्यमयी ..!

तू स्निग्ध, तू स्नेहार्द्र
तू आदिमाया तेजोमयी ..!!

विशाल

निरोप…

कसा आज मोगरीने डाव साधला
सुन्न ओझे आठवांचे घाव घातला..

सुटे भान दिशाहिन आज जाहलो
सापडेना मार्ग माझा चांद मातला..

हरवले माझे पण तुला पाहता
आसवांनी दोर माझा आज कापला..

संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता
भुतकाळ रम्य सारा आज बाटला..

हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी
आसवांना लपविता भाव दाटला..

एकवार हास पुन्हा ओठ दुमडुनी
अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..!

विशाल.

अस्तित्व…

 
माझं असणं तुझ्या
हंसण्यात चिंब भिजलेलं
तुझं असणं माझ्या
रोमरोमी पक्कं भिनलेलं
 
माझं जगणं पुर्णत:
तुझ्या अस्तित्वाने भारलेलं
तुजसमोर येणं
मी नेहेमीच टाळलेलं

तुझं असणं सदैव
माझ्या गात्रांत साठवलेलं
तुझ्या हंसण्यानं
रडणार्‍या मलाही हसवलेलं

तुला स्मरताना आज
तुझं ते हसणं आठवलेलं
तुला विसरताना
माझं हंसणंच हरवलेलं

विशाल

असे धर्म प्रीतीचे बाटले, किती ?

 
मला सांग आभाळ फाटले, किती ?
तुझे ही अश्रू आज आटले, किती ?
 
दिशाहीन वारे फोफावले असे
दिशांनीच वार्‍याला छाटले, किती ?

सुक्या भावनांनी ओलावले मना
मुके दोर मी पुन्हा काटले, किती ?

जुन्या आठवांनी वेडावले अता
तुझे भाव आभासी दाटले, किती ?

कशाला हवी वेड्या यातना नवी
पसारे जखमांचे साठले, किती ?

नको राग प्रीतीचा बाळगू असा
असे धर्म प्रीतीचे बाटले, किती ?

विशाल.

राधा ही बावरी …

तु पांघरशी नभ निळे
मज मोहवे वदन सावळे
खुळावले नयन जुळे
सख्या न माझे मला आकळे

लट भाळी केश कुरळे
पाहुनी ते मम चित्तही चळे
तुज पाहता अहं गळे
पान्हावली मुरली खुण कळे

यमुनातीरी आनंदमेळे
वृंदावन झाले आज बावळे
शाम सावळा रास खेळे
कामधेनु सोडी मुक्त आचळे

जाती घटिका आणि पळे
कालपाश अन कंठी आवळे
नाम तुझे मनी सावळे
हवा कशाला तो स्वर्ग ना कळे

विशाल.

पाहतो आहे ….

 
थांबला आसवांचा पाऊस पापण्यांशी
मी तुझ्या बरसण्याची, वाट पाहतो आहे
 
झगडलो वेदनांशी कोंडुन जाणीवांना
आठवांचा आज प्रिये, थाट पाहतो आहे
 
ओसंडु पाहे कसा गुदमर मनातला
थोपवली भावनांची, लाट पाहतो आहे
 
ओथंबले काठ अता डोळ्यांचे सखे
मोडुनी चौकट वाहे, पाट पाहतो आहे
 
संपले ते उजळणे पुन्हा मनोरथांचे
गातात दु:ख सुखाने, भाट पाहतो आहे
 
विशाल

Thursday, July 22, 2010

वेदना…

खेळलो मी सुखे तो डाव तुझाच होता
सोसला मी सखे तो घाव तुझाच होता

थांबलेल्या प्रिये त्या तारका आसमंती
भावलेला सखे तो गाव तुझाच होता

संपले मार्ग सारे चांद ही थांबलेला
दाटला जो मनी तो भाव तुझाच होता

बांधले मी अता देऊळ वेड्या मनाचे
बाटल्या जाणिवा तो ….., आव तुझाच होता

अंतरी कोंडल्या दु:खांत जो गूंतलेला
सोडला मी सुखे तो ठाव तुझाच होता

विशाल

लिलाव…

कुणीतरी ……
मला पण विचारा ना रे
मला काय हवंय ते !

निर्जीव …..
विकल्या जाणार्‍या
वस्तुंमध्ये नाहीये मी !

त्यांनाही …..
नाही जमले कधी
या गांधीला खरीदणे !

महाग …..
होता खुपच तेव्हाही
हा निष्कांचन म्हातारा !

एकटा …..
पडलोय मी आता
त्या कागदी तुकड्यांवर !

कंटाळा …..
येतो एकटे बसण्याचा
कार्यालयांच्या भिंतीवर !

नकोय …..
नोटेवरचा एकटेपणा
भिंतीवरचा अलिप्तपणा !

हृदयात …..
थोडीशी तुमच्या विचारात
हवीय जागा आचरणात !

विशाल

लगाम…

 
त्याचा आणि माझा
संवाद तसा जुनाच आहे
संवाद तरी कसे म्हणायचे
र्‍याचदा फक्त तोच बोलतो
नाही म्हणायला शंका असतात माझ्या,
परवाच विचारले त्याला
हा
कॅनव्हास बघितलास
पांढराशुभ्र ….., रंगवायचाय मला !
हंसला ….., हळुवारपणे म्हणाला
वेड्या ….! अरे आत्माच तो जणु
निर्लेप असतो …. निर्विकार
ना रंग ना रुप ना कसल्या अभिलाषा
त्या फलकाची चौकट आहे ना…
तो देह रे ! कुठलेतरी बंधन हवेच ना?
हा … त्याला कुठले रंग द्यायचे
हे मात्र सर्वस्वी तुच ठरवायचस
तुझ्या मनातला अंधारही …
सार्थपणे उमटेल बघ त्याच्यावर
पण त्या अंधारालाही
प्रकाशाची छटा द्यायला विसरू नकोस…
तुझ्या मनातला विषय … वासना रेखाट हवे तर..!
पण त्यात मिसळ आठवणीने…
रंग माणुसकीचा आणि ….
सद्
सद् विवेक बुद्धीचे अ‍ॅडिटीव्हही….
बंधने नको घालुस कुंचल्याला,
सुटू दे बेफ़ाम हवा तसा…
नेहेमीच भरकटणा
र्‍या मनासारखा…
सोड रे… कशाला हवा संयमाचा अहंकार….
मी आहे ना …. त्याचा लगाम आवळायला !
 
विशाल.

ठिगळ…

वेडाच दिसतोय
केव्हाचा झालं
आकाशाकडे बघुन
चित्रविचित्र …
हातवारे करतोय
विचारलं तर हंसला
हळुच म्हणाला
ठिगळ लावतोय
फाटलेल्या आभाळाला
जमलंच तर
फसकलेल्या नितीमत्तेला
पण साला, सुई
आत शिरतच नाही
शिरली तर मागे
फिरतच नाही
म्हटलं राजा …
तुला कसं सांगु
वेड्या, फाटलेलं आभाळ
सुईने नाही,
तर कर्तुत्वाने
शिवायचं असतं
आणि गेंड्याच्या कातडीच्या
नादी लागायचं नसतं
तिथे सुया
नेहमीच हरवणार
अरे माणसं खाणारी
ही बकासुरी पोटं
तुझ्या इवल्याशा सुईने
कुठपर्यंत शिवणार
नितीमत्तेचं सोड
उभा माणुस पचवला
तरी हे ढेकर नाही देणार
विषण्ण हंसला
म्हणाला..
काय करु
हे ही सोडलं तर
पोट कसा भरु
लोक वेडा समजतात
दोन पैसे टाकुन
चालायला लागतात
काम मागायला गेलं तर
हाकलुन लावतात
शहाण्यासारखं वागलं तर
काम का करत नाही म्हणतात
म्हणुनच नेटाने
सुई चालवतोय
कधीतरी पक्का
टाका बसेल
आभाळाला नाही
निदान फाटलेलं
माझं नशिब तरी सांधेल
नाहीच जमलं
तर त्यांनी फेकलेल्या
पैशांनी, माझं
पोट तरी भरेल.

विशाल.

बाप…

 
छपराच्या दांडीवरचा
एकाक्ष कावळा
मला बघुन हसला
हळुच म्हणाला
काळा असलो तरी
मी ‘काक’ आहे
पिंडाला शिवण्यापुरता
मी तुझा बाप आहे
आज ना उद्या
तु ही जाशील
पुन्हा कावळे जमतील
आमच्यापैकी नसले
तर तुमच्यातले असतील
तुझ्या जन्मापासुन जमलेले
तुझ्या पिंडावर टपलेले
आमच्यापासुन सुटका नाही
आम्हाला अंत नाही
कारण इथे …..
रोज नवा पिंड असेल
आम्हा कावळ्यांची
रोजच चैन असेल
तु असलास काय
अन नसलास काय
मी मात्र कायम असेन
तुझ्या पिंडावर
कुणाचाही डोळा असला
तरी काक म्हणुन
फक्त माझाच हक्क असेल

विशाल

राधा ही बावरी…

तु पांघरशी नभ निळे
मज मोहवे वदन सावळे
खुळावले नयन जुळे
सख्या न माझे मला आकळे

लट भाळी केश कुरळे
पाहुनी ते मम चित्तही चळे
तुज पाहता अहं गळे
पान्हावली मुरली खुण कळे

यमुनातीरी आनंदमेळे
वृंदावन झाले आज बावळे
शाम सावळा रास खेळे
कामधेनु सोडी मुक्त आचळे

जाती घटिका आणि पळे
कालपाश अन कंठी आवळे
नाम तुझे मनी सावळे
हवा कशाला तो स्वर्ग ना कळे

विशाल

अस्तित्व…

माझं असणं तुझ्या
हंसण्यात चिंब भिजलेलं
तुझं असणं माझ्या
रोमरोमी पक्कं भिनलेलं

माझं जगणं पुर्णत:
तुझ्या अस्तित्वाने भारलेलं
तुजसमोर येणं
मी नेहेमीच टाळलेलं

तुझं असणं सदैव
माझ्या गात्रांत साठवलेलं
तुझ्या हंसण्यानं
रडनार्‍या मलाही हसवलेलं

तुला स्मरताना आज
तुझं ते हसणं आठवलेलं
तुला विसरताना
माझं हंसणंच हरवलेलं

विशाल

खंत…

मला सांग आभाळ फाटले किती ?
तुझे ही अश्रू आज आटले किती ?

दिशाहीन वारे फोफावले असे
दिशांनीच वार्‍याला छाटले किती ?

सुक्या भावनांनी ओलावले मना
मुके दोर मी पुन्हा काटले किती ?

जुन्या आठवांनी वेडावले अता
तुझे भाव आभासी दाटले किती ?

कशाला हवी वेड्या यातना नवी
पसारे जखमांचे साठले किती ?

नको राग प्रीतीचा बाळगू असा
असे धर्म प्रीतीचे बाटले किती ?

विशाल

धरतीचे गीत…

स्वार होवुनी मुक्त नभांवर
मी गीत गायले धरतीचे
सवे मिळुनी रे ये बळीराजा
फेडु पांग चल वसुधेचे
……… उपकार स्मरु या मातीचे !

कुशीत तिच्या रे मोती पिकती
बीज पेरु आपल्या घामाचे
रे पिकवु सोने हिरवे आता
फेडु ऋण धरतीमातेचे
………. उपकार स्मरु या मातीचे !

फुलवु हिरवाईने सर्व धरा
व्रत घेवु या काळ्या आईचे
कृषका जोड रे नांगर आता
डोहाळे पुरवु धरणीचे
……….. उपकार स्मरु या मातीचे !

तिज ह्रुदयी वसे आभाळमाया
कण वेचु तिच्या वात्सल्याचे
चल गड्या आज मिळुनी गावु
गीत नवे हे वसुंधरेचे
……….. उपकार स्मरु या मातीचे.

विशाल

आतुर…

जागली रात्र हिरवी
सांज कोवळी लाजली
झोपला गं दिनमणी
चंद्रकला हि फाकली...

काजवे गुज करती
क्षितिजाही सैलावली
धुंदी तव लोचनी
गात्रे सारी मस्तावली...

चाहुल तुझी सजणी
रातराणी धुंदावली
प्राजक्त गातो अंगाई
बघ पश्चिमा उजळली...

सखे रात ही जागवु
चल तनुत आगळी
नको आता दिरंगाई
निद्रा नयनी जागली..!

विशाल

पुन्हा एकदा ...

आता नकोच ते उसासे टाकणं,
जुनं आठवून उगाचच चरफडणं !
 
बेकरीच्या कळकट बरणीतल्या,
ओशटलेल्या केकसारखं बुरसटणं !
 
नको ते सदोदीत स्वप्नात रमणं,
स्वत:वरच ते पुन्हा पुन्हा वैतागणं !
 
आता करावं म्हणतो सुरू पुन्हा,
रोज नव्याने नवे नवे रस्ते बांधणं !
 
प्रत्येक वळणावर एखादा नवा,
जुन्यालाही छेदणारा प्रश्न उभारणं !
 
नकोत उगाळायला चुका जुन्या,
विसरेन म्हणतो रडगाणी उगाळणं !
 
आता नव्या हुरूपानं गुंते करणं,
जुन्याच समस्या नव्याने शोधणं !
 
कदाचीत या आगळ्या कैफातच,
पुन्हा प्रवाही होईल माझं जगणं !
 
विशाल

जाणे तूझे ...

शब्द शब्द तोलताना
ओठ निर्जीव जाहले
मौनास अर्थ लाभला
अन डोळे ओलावले

वळणावर वळताना
हळुच वळुन पाहीले
पाहुनी उदास रस्त्या
जाणिले, तुज गमावले

उदास शांत रात्रीला
वेदनांवरी पांघरले
गुंफले हास्यात अश्रू
दु:ख अंतरी दडपले

येणे तुझे अलगद
जाणिवांनी टिपलेले
जाणे नकळत तुझे
डोळ्यांनाही जाणवले

विशाल

हिरवाई…

इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ निशःब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर
ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर

विशाल

तुला पाहता …..

तुला पाहता गेंद गाली फुलावे असे
उगा मोगरीने पहाटे फुगावे असे !

जरासे मला आज हासून तू पाहता
कळीने जुईच्या, मनी हे रुसावे असे !

मला ना कळाले फुलांचे बहाणे सखे
मनी आज माझ्या कळ्यांनी रुतावे असे !

तुझ्या धूंद कैफात बेभान व्हावे सुखे
सवे पाखरांनी फुलांच्या झुलावे असे !

फुलांनीच सामील वार्‍यास व्हावे अता
समीरा..,किती हे कळ्यांनी छळावे असे ?

विशाल.

Friday, July 16, 2010

जोखड

काल झाले जे होवुन गेले
आज तयाची स्मृती नको

नवा सुर्य आनंदे पेलु
याद रात्रीची पुन्हा नको

नव्या दमाने स्वप्ने पाहु
सत्याचा पण विसर नको

प्रयत्ने सारी स्वप्ने साकारु
निराशेची मग साथ नको

आकांक्षांच्या नभी वावरु
अपेक्षांचे ते ओझे नको

सुखे सारी नव्याने मिळवु
दु:खाची ती सयही नको

नवजीवना सामोरे जावु
जुन्या स्मृतींचे जोखड नको.

विशाल.

सखा ....

मत्त मी, मदमस्त मी
आषाढीचा जलद मी
साद घालतो उधाणवारा
………..पाऊस माझा सखा !

धुंद मी, मृदगंध मी
वरुणाचा वर्षाव मी
वळवाचा तो थेंब साजीरा
………..पाऊस माझा सखा !

मी धरा, दंवाचा थेंब मी
घनगंभीर आकाश मी
बेधुंद बरसती वर्षा धारा
………..पाऊस माझा सखा !

तृप्त मी, आश्वस्त मी
पाऊसवेडा चातक मी
मनमोराचा फुले पिसारा
…………पाऊस माझा सखा !

विशाल.

मज वाटे ...

मज वाटे पावसाशी
नाते माझे नित्य असावे
आसवांनी शुष्क माझ्या
पावसात सचैल न्हावे

पांघरुनी पाऊसधारा
हिरवे मी गवत बनावे
क्षणभंगुर जलथेंबाचे
हलकेच तोल सावरावे

हिरवाईचे हळवे स्पंदन
श्वासांनी अलवार टिपावे
मुग्ध ओल्या जाणिवांनी
पावसाचे गाणे शिकावे

पावसात अन भिजताना
हलकेच तुज मनी स्मरावे
ओलेत्या स्मृतीत तुझिया
भान सखे क्षण विसरावे

विशाल.

नांदी ...

आकाशी जलद जलद नाचू लागले
आषाढसरी, मन माझे न्हाऊ लागले!
 
दरवळ तो मातीचा मनास मोहवी
वर्षेचे कंजन, बघ कानी गुंजू लागले!

मग खेळणे वर्षेच्या धारांशी वार्‍याचे
मनात आगळे, अलगुज छेडू लागले!

संपले बघ वाट पाहणे ते चातकाचे
आनंदविभोर, मोर वनी नाचू लागले!

रोमांचित जाहली बघ तृषार्त धरा
नग्ननिखळ, हास्य तिचे फुलू लागले!



(लिहायला सुरुवात केल्यानंतरची माझी दुसरी कविता)

विशाल

दिव्यातला राक्षस…

समुद्रकिनारी फिरताना,
जुना गंजला दिवा मिळाला
हलकेच घासता दिव्यामधुनी
राक्षसकी हो निघाला
हा हा हा हा ….
विकट हास्य करुन म्हणाला
बोल मेरे आका,
कहा करु तेरा तबादला
तबादला तर कधीच झाला
शोधतो नव्या शहरात दलाला
घर शोधणे झाले मुश्किल
बाबा रे, आता तुझाच हवाला
विषण्ण हसला, हळुच म्हणाला
मालको, जुना जमाना गेला
असते जर सोपे शोधणे
आजकाल प्रामाणिक दलाला
गुलाम तुझा हा असा
असता का गंजल्या दिव्यात राहीला
खारघर, कल्याण नाहीतर
गेलाबाजार एखादा कर्जतला
वन बी एच के नसता का पाहिला.

विशाल

पश्चाताप ...

अदभुत माझ्या भाळावरचे
वरदान वाटले मातेला
रे कुणी कितीक दिल्या आहुती
गवसल्या कितीक वेदना
चिरंजीव मी अश्वत्थामा
…… मज भय कसले ते मृत्युचे !
 
अस्वस्थ तप्त रुधिर द्रोणाचे
नकळत भुलले मायेला
अपराध कसे किती जाहले
नी जाहल्या अक्षम्य चुका
चिरंजीव मी अश्वत्थामा
…… मज नुरले भान विवेकाचे!

जगावेगळे ते प्रेम सख्याचे
का अंतरलो त्या करुणेला
जपले सदैव हे मैत्र फसवे
काय म्हणावे या सुह्रदा
चिरंजीव मी अश्वत्थामा
…… मज अनावर ओझे काळाचे!

विशाल

चांदवा…

समजावणे मना, न..,
सोपे राहीले आता
केसात माळलेले सखे
तु चांदणे कैवल्याचे
जाहलो बेभान मी
पाहुन तुझा चांदवा
बघ चकोर मातला
पिऊनही कोश चांदण्याचे
चांदणे डोळ्यात तुझ्या
मुग्ध धुंदल्या तारका
कसा चांदही लाजला
पाहुनी देणॆ हे लावण्याचे
धुंद मी विरघळलो
बघ पंकही गळाला
वृद्ध निवडुंग सजला
लेवुनी लेणे हे तारुण्याचे

विशाल

Monday, July 12, 2010

एकटी…

नेहमीच तुला
तशी मी विसरले
विसरताना सदैव
तुलाच स्मरले...

राखुन अंतर
नेहमीच बसले
गालात हलके
एकटीच हसले...

ओलेती पहाट
मनी भुप रंगला
तरी मी सदैव
भैरवीत दंगले...

पट मेघांचे
वसंत फ़ुलला
मी शरदाच्या
स्मृतीत झुरले..!

विशाल.

मोरपीस मी झाले रे..!

नील नभाच्या पंखावरती
होवुनी स्वार मी आले रे
नभमालेच्या मंडपात या
झड वर्षेची मी झाले रे
………..मोरपीस मी झाले रे..!
समीरासंगे धुंद होवुनी
दंवासवे मी झुलले रे
फुलपाखरु माझ्या मनीचे
अंगणी भिरभिरले रे
………..मोरपीस मी झाले रे..!
पिऊनी गंध तुझ्या प्रीतीचा
साज नवतीचा ल्याले रे
सुखही झाले असह्य आता
प्रेमसागरी तव न्हाले रे
………..मोरपीस मी झाले रे..!
मिठीत येता तुझ्या साजणा
गंधाळुन मी फुलले रे
गीत जन्मले आज प्रीतीचे
धुंदावुन जीवन गेले रे
………..मोरपीस मी झाले रे..!

विशाल

पाऊस…

रेखिल्या धरित्रीने अपुल्या भाळी
हिरव्या हिरव्या मऊ मखमाली
रानफ़ुलांची मनमोहक लाली
सजविली धरेने अपुल्या गाली
मंद सुरात रे गातो निर्झर…
…….आली वरुणाची स्वारी आली…
 
भेटाया सख्या प्रियकरा सजली
आरक्तता धरे तव गाली आली
लट वर्षेची केशांत माळली
मुखड्यावर तव पृथा भाळली
मंद स्वरात रे गातो निर्झर…
…….आली वरुणाची स्वारी आली….

भेटाया सागरा आतुर जाहली
साथ तिला वर्षेची लाभली
सवे नदीच्या तव प्रिया निघाली
घटिका मिलनाची समीप आली….
मंद सुरात रे गातो निर्झर….
…….आली वरुणाची स्वारी आली.

विशाल

गुपित…

का रुंदावली नकळत ती
प्रत्यंचा तव नयनांची
का आरक्त झाली सजणे
पाकळी तव अधरांची
हसुन उमलली कृष्णकळी
…………मी गुपित जाणिले काही.
का रेंगाळली तव भाली
लट अवखळ केशांची
का थबकली उंबरठ्यावर
पावले तुझी रेशमांची
लाजेने भिजली मुग्धकळी
…………मी गुपित जाणिले काही.
येणार आज कोणी
जाणीव ही सुखाची
डोळ्यात जी उमटली
खुण नव्या प्रीतीची
फुलून गेली स्वप्नकळी
…………मी गुपित जाणिले काही.
उमजुन आज काही
धुंदावल्या फुलांनी
कथिले अलगद सखये
गुज तुझे मम कानी
आरक्त फुलली फुलकळी
…………मी गुपित जाणिले काही.

विशाल.

विरह…

सुरु व्हायची जिथपासुनी
संपुनी गेली तिथेच कहाणी
साक्ष असे या पर्वा सखये
व्याकुळ माझ्या नयनी पाणी
रुचे सुचे नच काही तुजविण
……जीव जडे तुज ठायी सजणी..!
असेन मी अन नसेन मी
असशील तु मम कणोकणी
क्षण क्षण सये तुज स्मरताना
झालो वेडा तुजविण रमणी
रिते जाहले सर्व नभांगण
……जीव जडे तुज ठायी सजणी..!
अंगणातली करुण जुईली
गुदमरली ती रातराणी
सय तुझी क्षण क्षण येइ
खुणावते तव याद पुराणी
जाणे नच मजला तुझे साहवे
……जीव जडे तुज ठायी सजणी..!
विशाल

दाखला…

 
ऐकताय ना ….
तिकीटपण लावुन पाहिलं,
तर मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातुन फोन आला ..
बाईसाहेब येताहेत साहेबांच्या सोबत..
दोन ‘पास’ तयार ठेवा..!
दुसर्‍या दिवशी समाधीशेजारी ,
तात्पुरते बंकर्स बांधण्यात आले ,
साहेब येणार दर्शनाला, सुरक्षा नको?
जन्मभर बापुंची सोबत केलीत …,
मृत्युनंतर तात्पुरता का होईना …
मशिनगन्सचा शेजार …(?)
एवढी निर्घुण थट्टा…,
कोणी केली होती का हो तुमची …?
त्या अशक्त वृद्धाबरोबर..
किती निर्धास्त, सुरक्षित होतात…!
आता शस्त्रांच्या सोबतीत..
जाणवतेय ती सुरक्षा..तो निर्धास्तपणा ..?
चला….., निदान मी तरी निर्धास्तपणे जावु शकेन
जन्म – मृत्यु कार्यालयात..,
माझ्याच जिवंतपणाचा दाखला आणण्यासाठी
पेन्शनची तारीख जवळ आलीय ना !

विशाल.

आठवतं तुला …?

कधीपासुन उभाय तो
वाट पाहात
तिकडुन येणार्‍या गाडीची
वळणापलिकडुन
कानावर येणारी शिटी
आतुरलेले कान
आसुसलेलं मन
आठवतं तुला ?
मीही उभा असायचो
असाच, तुझी वाट पाहात
रोमरोमात सामावलेला
तुझा तो गंध
रंध्रारंध्रातुन विरघळलेले
तुझे मोहक विभ्रम
ती धुंदी इतकी अनावर
की गाडी आली कधी
अन गेली कधी
कळलेच नाही
तुझ्या स्वप्नात हरवलेला मी
तुझं ते पुकारणं
माझ्यापर्यंत पोचलंच नाही
आता त्याची पाळी आहे
तिची हाक त्याला
ऐकु येइल ना ?
की माझ्यासारखीच
त्याचीही गाडी चुकेल ?

विशाल

शोकांतिका …

काल रात्री
मो. क. गांधी भेटले होते
महात्मा गांधींना पाहिलंसका?
म्हणुन विचारत होते
त्यांनी म्हणे कधीकाळी
रामराज्याचा संकल्प सोडला होता
काल सांगत होते
त्यांच्या रामराज्यातला
रामच हरवला होता
त्यांच्या डोळ्यातलं पाणी म्हणालं
पोरा..
आजकाल सगळेच
गांधीवादी झालेत
बहुतांशी खादी(?)वादी झालेत
आज समाजात
खादीला(?) मोठा मान आहे
मनात गांधी नसला तरी
डोईवर गांधीटोपीची शान आहे
गांधीवादातला वाद राहिलाय
गांधी कुठेतरी हरवलाय….!
कुणी येताय का शोधायला..
हिंसेच्या गर्दीत अहिंसावादी हरवलाय..
काल रात्री
मोहनदास करमचंद गांधी भेटले होते
हरवलेल्या महात्म्याला..
एकटेच शोधत होते…!
विशाल

” आर्त ”

 
भिजे पापणी
पाणी हळवे
अतृप्त जाणिवा
……फसलो नाही !
निळे पाखरु
विचार फसवे
अव्यक्त भावना
……..रुसलो नाही !
गळे पालवी
अस्वस्थ वणवे
विरक्त काजवा
…….झुरलो नाही !
मनी शुन्यता
अदृष्य दुरावे
उदास जोगीया
…….रमलो नाही !
सुने मी पण
अस्तित्व नुरावे
माझ्यात मीच
…….. बुडलो नाही !
विशाल.

यल्गार …

आता सोड
तारे मोजायचं..
मोजताना चुकलं की
आपणच हळहळायचं..
ही मोजणी
नेहेमीच चुकणार..
इथे रोजच मृत्युला
नवा घास मिळणार..
बाँब आणि बुलेटस
आपलं प्राक्तन असणार ..
आपलेच हात
आणि आपलेच गळे..
लक्षात ठेव
आपल्याच काळजाला..
आपणच पाळलेल्या
श्वापदांचे सुळे..
ते म्हणतात
आग विझवलीय..
आमच्याच राखेखाली
ठिणगी दडपलीय..
म्हणुन म्हणतो
तारे मोजणं सोड..
राखेखालची ठिणगी शोध
ऐक्याची मार फुंकर..
चेतव वन्ही स्वत्वाचा
आणि कर यल्गार..
नव्या युद्धाचा
अस्तित्वाच्या लढाईचा…!
विशाल

वळीव …

माज्या मायनं मया
सकाय सकाय सांगटलेलं
जात्याव बसल्याबसल्या
आविष्याचं कोडं उकिलल्यालं
जगणं..त्यात सगरंच समाईक…
कंदी नशीबात सुक
त कंदी भारंभार दुक
काळजातलं
रडगाणं मातुर
सगर्‍यांचच समाईक….
कुटं भुक मानसाला मारतिया
कुटं मानुसच
मानुसकी खातुया
कंदीकंदी भुकच खावुन
सुकाची ढेकर देतुया….
नायतर आमच्यावानी
उंद्याची वाट पगत जगतुया
सा मैन्यातुन येणार्‍या
वळवासाटनं..
आविष्यभर वाट पगतुया….
विशाल

त्सुनामी …

उद्दंड जाहल्या लाटा
तांडव करीती वारे
स्तब्ध चंद्रमा नभात
हरवुन गेले तारे…
बेभान जाहली गाज
सागरा जावु कसा रे
सारे किनारे संपले
कसा आवरु पिसारे…
मिठीत घेण्या धरणी
करशी किती पसारे
डोळ्यात दाटले पाणी
सांगु वेदना कशा रे
पांघरशी स्वप्न निळे
स्वप्नांचे धुंद मनोरे
स्नेह तुझा ओसरला
रे बघ खुंटले फुलोरे
विशाल

मिलनवेळा…

रुजली मनात अलगद माझ्या
आतुर सखये ती साजणवेळा
दाटुनी आला मग गात्रांमधुनी
भाव प्रीतीचा मदमस्त आगळा
मज भान नुरे मग अस्तित्वाचे
मधु गंध प्रियेचा असे वेगळा
झंकारुनी स्वरतरंग प्रीतीचे
घालीती तरुवर गळ्यात गळा
व्याकुळले अन पंचप्राण मम
अनुभवण्या अति रम्य सोहळा
आर्त मनीचे मग झाले धुसर
येताच जवळ ती मिलनवेळा
विशाल

गरज …

दाराआतला मी अन बाहेरचा तु
तुला वाटतंय… मी सुरक्षित आहे
सुखी नसलो..तरी समाधानी आहे….
तुला काय माहीत..चौकटीतलं माझं मरणं
प्रत्येक श्वासासाठी नियतीशी झगडणं
एक एक क्षण जपण्यासाठी तडफडणं
स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी
कदाचित आत येण्यासाठी, तु धडपडतोयस
प्रसंगी मलाही बाहेर खेचू पाहतोयस
पण, आणि तरीही मला तु हवा आहेस
कारण तुझ्याशिवाय संतुलन राखणं अशक्य आहे.
म्हणुन काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे.
विशाल

आता नाही…!

आसवांचा जुना आड आता नाही
वेदनांचे तसे लाड आता नाही..
मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा
वास्तवाच्या भुता ‘झाड’ आता नाही..
वेदनांची खरी जाहली मज सोबत
संकटांना नव्या “हाssssड”, आता नाही..
कल्पनांचा मना लाभला आधार नि…
जाणिवांची तशी चाड आता नाही..
झेलले घाव सारे सदा सुमनांचे
अन नव्याने भ्रमर धाड ….., आता नाही
 विशाल

शोध …

अंधाराच्या साम्राज्यावर
दिवटीचा तोरा
सुर्य उभा कोपर्‍यात
काजवे करताहेत नखरा
क्षितीजावर उभे
प्रकाशाचे दुत
पण आसमंत सारा
सावल्यांनी झाकोळलेला
मी कुणाला विचारु
सुखाचा रस्ता
इथे प्रत्येक जण
वेदनेने पिळवटलेला
कधीचा शोधतोय
मी नेहेमीच गोंधळलेला
अंधाराच्या दुनियेत
प्रकाशालाच अडखळलेला.
विशाल

” शापित “

तुझं रुपडं
एक जिवंत कविता ..
सतत बदलणारी
तुझी विविध रुपं…
एक मुर्तिमंत काव्य..
तुझे मोहक विभ्रम
त्यात दडलेल्या
कविंच्या संकल्पना
आणि तरीही…
तु शापित…?
महीनो न महीने
तुझ्यासाठी तिष्ठणार्‍या
चकोराचे समर्पण
तुझ्या डागांचेदेखिल
आम्हाला वाटणारे
अनामिक आकर्षण
हे देखिल गुढच..
आणि तरीही………
तु शापित…?
तुझी प्रत्येक प्रतिमा
धुंदावणारी
मनाला लोभावणारी
धुंद प्रेमिकांना
हळुवार खुणावणारी
विरही मनाला
शांतवणारी..
आणि तरीही……
तु शापित…?
का हा…
प्रकाशाच्या माथ्यावर
कायम…
अंधाराचा टिळा..!
विशाल

जाणं फुलराणीचं….

फुलाचं कोमेजणं
गृहितच धरलेलं
तरीही तुझं अकाली जाणं
मनात, कुठेतरी आत
…….खोलवर जखम करुन गेलेलं.
तुझ्या असण्याने आमचं
भावविश्व सांभाळलेलं
आज तुझ्या नसण्याने
आमचं ते असणंच गमावलेलं.
…….मनाच्या पातळीवर काही हरवलेलं
तुझ्या अभिनयाने
जगणं शिकवलेलं
जगावेगळ्या तुझ्या एक्झीटने
आमचं जगणंच विसरलेलं.
……आपलं असं काही कायमचं दुरावलेलं
तुझ्या अस्तित्वाने आमच्या
जाणिवांचं भान राखलेलं
अशा अचानक जाण्याने
नकळत सगळंच विसकटलेलं
……मनाचं असं भरकटणं कागदावर उमटलेलं !
विशाल

रामायण…

ते म्हणतात
आम्हीच…
राममंदीर बांधणार
रामाच्या नावाखाली
इथे लक्ष्मणच..
भरताला मारणार
मानवतारुपी सीता
पुन्हा-पुन्हा..
भुमीत सामावणार.
कारण…..
कितीदाही
अनुभव घेतला
तरी मायेचा सुवर्णमृग,
तिला पुन्हा-पुन्हा
मोहात पाडणार.
विशाल

बंध…

 
श्वास म्हणाला कुडीला
सखे,
जन्मो-जन्मीचा ऋणानुबंध आपला.
तुझं माझं नातं
जे आभाळाशी मातीचं
सागराशी क्षितीजाचं
जे नातं असतं
रुसलेल्या कपोलांशी
तिथेच रेंगाळलेल्या आसवांचं
एकमेकांशी आपलं समर्पण
जगावेगळ्या ओढीचं
माझ्याशिवाय तुझ्या
असण्याला अर्थ नाही
तु नसशील तर
माझ्या असण्याची
मुळी आवश्यकताच नाही.
परस्परांशिवाय आपलं
असणं मुळी
अपेक्षितच नाही.
विशाल

धावा …

क्षुब्ध कौरवसभेत
असहाय उभी
एकवस्त्रा, रजस्वला
याज्ञसेनी…..
पांचालीच्या
पदराला हात घालणारे
उन्मत्त दु:शासन,
सत्तेच्या धुंदीत चुर
मदाधूंद दुर्योधन,
अधःपतीत,
भरकटलेले अंगराज,
अंध, स्वार्थांध
विवेकहिन धृतराष्ट्र,
कुटील ,
विकृत शकुनी,
हताश,
निराश पितामह,
थकलेले कृपीपुत्र,
अन् हतोत्साहित…
विदुरकाका !
पत्नीला पणाला लावणारे
पराक्रमी (?) पांडुपुत्र,
आहेत…
आजही हे सगळे आहेत,
या कुरुक्षेत्रात
मी मात्र गलितगात्र झालोय,
किंकर्तव्यमुढ पार्थासारखा!
महाभारती
द्रौपदी रक्षीलीस..
आज कुठे आहेस
कृष्णा, परमात्म्या..
आज तु कुठे आहेस?
विशाल

लतास………

तुझे गाणे तुझे नाही
तुझे असणे तुझे नाही
ते किंचित हंसणे तुझे नाही..
तो गंधार, तो मल्हार
असतील ते सुर तुझे,
पण त्याचे वेड तुझे नाही !
तुझ्या ओठीचा शब्द
तुझ्या गळ्याचे सुर
व्यसन कोकीळे ते तुझे नाही !
तुझ्या सुरातली तंद्री
तुझ्या स्वरातली धुंदी
ते धुंदावणे तुझे नाही !
तानपुर्‍याची मधुर तान
किंचित लवणारी सुरेल मान
ते वेडावणे तुझे नाही !
तुझे सुर श्वासात भिनलेले
त्या स्वरांसह श्वासांची
गती वाढणे तुझे नाही!
तो हक्क आम्हा रसिकांचा
तुझ्या गळ्याच्या गुलामाचा
ते भाग्य कोकिळे तुझे नाही !
विशाल

तु असतास तर…

तु असतास तर..
डोळे कधी भरले नसते
रुमालाचे शेव कधी
आसवांनी भिजले नसते
डोळे पुसता पुसता
…………हात माझे थकले नसते.
तु असतास तर..
गालावर फुललेले गुलाब
अकाली कोमजले नसते
स्वप्ने पहायच्या वयात
जिथे प्राजक्त फुलायचे
………..तिथे काटे रुतले नसते.
तु असतास तर..
सजली असती मग निशीगंधाही
हंसली असती मग परसातली
अबोल मुग्ध ती रातराणीही
कुंपणावरच्या जाई-जुईंनी
…………कुजबुजणे सोडले नसते.
तु असतास तर..
असले असते माझे असणेही
तुझ्या असण्यातले माझे
माझ्या असण्याला शोधणेही
भिरभिरणार्‍या पापणीने मग
………..क्षितिज शोधणे सोडले नसते.
विशाल

दुष्काळ …

अधीर आर्त स्वरांनी
पुसते धरा नभाला
तो गंध तुझ्या स्मृतींचा
सख्या कुठे निमाला…
प्रीतीत रंगलेला
कणा-कणात रुजलेला
अपुल्या मधु-मिलनाचा
मृदगंध कुठे हरवला…
आठवते अजुनी
भेट तुझी सौख्याची
त्या भेटीत गुंफलेला
स्नेहबंध कुठे गळाला…
स्खलित जाहले
पतिव्रता जरी मी
मनात गुंतलेला तो
स्पर्ष कुठे निमाला…
व्याकुळ धरणी वरुणासाठी
कृषक, पुत्र तिचा तोही पुसतसे
वरदहस्त प्रभो,
तव तो कुठे हरवला…?
विशाल

असहाय

संपले भास सारे
आभासही विरघले,
जागणार्‍या डोळ्यांतले
स्वप्न सारे भंगले !
वेगळ्या सार्‍या दिशा
आकाशही वेगळाले,
क्षितिजाच्या सीमेवरले
गांव सारे हरवले !
रेंगाळले रात्रीत काळ्या
चांदणे ते काजळलेले,
पाहवेना डागाळलेले
चंद्र बिंब कोमेजले !
लांबल्या सावल्या अन्
चालणे ही थांबलेले,
गावात माझ्या पोचलेले
मार्ग सारे खुरटले !
विशाल

गाणे आनंदाचे!



तेज दिपांचे उजळुन आले
दिप मनींचे झणी प्रकाशले..
तेजाळल्या त्या ज्योतींमधुनी
ओज तयांचे ओसंडुनी न्हाले..!!
दिपवाळीच्या आनंदामध्ये
आर्त मनांचे विरुनी गेले..
सुख-दु:खाच्या गंधासह मम
आयुष्य सुखे गंधावुन गेले..!!
गाणे मनीचे मग ओठी आले
दिपावलीसह फुलून गेले..
सुमन सुगंधी दिपावलीचे
दिपांसवे जीवनी दरवळले..!!
कानी निनादती तेच तराणे
सदैव एक ते आनंदी गाणे..
आले दिन सौख्याचे आले
सवे घेवुनी समृद्धीचे मेळे..!!
विशाल

आक्रंदन…


माझं जळणं, त्याचं जाळणं,
कधी थांबलंच नाही,
जेंव्हा कळालं तेंव्हा जाणवलं,
राख गोळा करायलाहीं..
शिल्लक कोणी उरलं नाही.
करपलेल्या जाणिवांचं,
मुक आक्रंदन..
कसं कोण जाणे
कोणी ऐकलंच नाही.
ते घाबरतात,
स्वतःच्याच प्रेतावर..
टोची मारणार्‍या,
माझ्यासारख्या निशाचराला.
कसं सांगु..
त्यांच्या परक्या चोचींपेक्षा,
माझी स्वतःची चोंच
कितीतरी..
सुसह्य आहे !
विशाल

खंत


बागेतला बाक
हिरवळीला म्हणाला,
सखे तुझे भाग्य थोर.
तुला कायम
तारुण्याचा सहवास!
आमच्या नशिबी मात्र
नेहेमीच..
वार्धक्याचे क्षीण नि:श्वास !
स्पर्ष तुला शैषवाचे
अन उमलत्या
नव्हाळीचेही !
आक्रंदती कानी माझ्या
श्वास जर्जर
वार्धक्याचे !
ही खंत नसे
केवळ
माझ्या मनीची !
तो बघ शेजारी
शुष्क
बाभुळही कळवळे !
विशाल

” प्रिया “

कृष्णसावळ्या केसांवरती
कण वर्षेचा क्षण रेंगाळे ,
काजळडोही चमकता मोती
पाहुनी चन्द्रही मनी जळे !!
नागिणीसम तव बटा सळसळे
कुठे पाहावे डोळा न कळे,
उगाच लटका भाव नयनी
जाणुनीया परि मनही चळे !!
सखे तुझी ती मोहक कांती
नवतीचेही मग भान गळे ,
पामर मी तव लावण्यापुढती
प्रीत तुझी नच मला गमे !!
तुझ्यात विरघुनी गेलो सखये
विसरलो घटीका न पळे ,
कधीच गेलो हरवुनी नयनी
प्रिये, माझे मला न कळे !!
विशाल

याचना…

माग सख्या हवे तुला जे
तु एकांत माझा मागु नको..
छाया तुझीच मी सखया
तु अंत असा रे पाहु नको !!
तुझ्य कवेत हे भान हरावे
ते क्षण सौख्याचे सांडु नको..
मी विसरले देह-भान माझे
तु शुद्ध मनाची मागु नको !!
वाटेवर तुझ्या क्षितिज सांडलेले
वाट पाहण्याची ओढ सोडु नको..
मम स्वप्नी अलगद डोकावताना
तु स्वप्न माझे मागु नको !!
डोळ्यात माझ्या नकळत लपताना
तु अश्रु माझे मागु नको ..
प्रीत माझी विसरताना
तु स्मृती माझ्या मागु नको !!
विशाल

कोवळीक … !

आकाशाच्या खिडकीतुन
सुर्य अलगद डोकवायचा,
गर्भरेशमी त्याची किरणं
आळसावलेल्या डोळ्यांनी मी टिपायचा.
त्याच्या येण्याने आभाळाला
लालसर झालर चढायची
तीच पांघरुन माझी जाग
ऊन्हे डोक्यावर येइतो झोपायची.
ऊन्हं वितळायला लागली
तेव्हा नकळत जाणवलं
अरे..सकाळची कोवळीक
आपण कधी अनुभवलीच नाही.
विशाल

भान…

लाजुनी अशा या वेळी
का पाहतेस गं खाली,
मज वाटे चुंबुन घ्यावी
या डोळ्यामधली लाली,
खुणावते मज खट्याळ
बट रेंगाळे तव भाळी,
ओठामागुनी साद घाली
तव गालावरची खळी,
सोडुनी मोह स्वप्नांचा
मी तुझे लाविले ध्यान,
विसरुनी बसलो सारे
मी अवघे देह-भान!
विशाल

‘निवृत्ती’

आयुष्याच्या वळणावरचा..
अन्तिम टप्पा सार्थकतेचा!
पुर्णतेचा, परिपुर्णतेचा..
शुचितेचा, सुख-प्राप्तीचा..
उन्नतीचा…निवृत्तीचा !
आयुष्याच्या वाटेवरची…
सर्वोच्च पावती तृप्ततेची!
सुखाची, समाधानाची..
गोडी आगळी कर्तव्यपुर्तीची..
जाणीव सुखाची…निवृत्तीची!
मार्ग जिवनाचा, तृप्त मनाचा..
ऐहिकतेच्या विलोपनाचा!
भौतिकाच्या निरोपाचा..
पारमार्थिक प्रारंभाचा..
वेध तो अद्वैताचा..अनंताचा!
ज्ञानराज माऊली म्हणतसे..
मी वेडा ‘सोपान’ ‘मुक्तीचा’..
हरीने कथिला मज..
मार्ग सुखाचा..
तो एकमेव …निवृत्तिचा !!
विशाल.

तू...

तुझं अलगद येणं
माझ्या जाणिवांनी
टिपलं होतं.
तुझं नकळत जाणं
माझ्या डोळ्यांनाही
जाणवलं होतं.
तु आलीस
तेव्हा अंगणातला
प्राजक्त
बहरला होता.
जाई-जुई
कुजबुजायला
लागल्या होत्या.
आता
तु नाहीस…
बघ..
मोगर्‍याने सुद्धा
मान टाकलीय.
विशाल

Friday, July 9, 2010

घर ...

तुझ्या
एका हंसण्यानं
आपल्यातलं
सारे अंतर
पार केलंय.
मधल्या…
सगळ्या…
भिंती पाडुन
मी
तिथे एक
दार केलंय.
स्वप्नात
पाहण्यासाठी
छोटंसंच..
एक घर
शोधलंय
तु
लवकर ये
तुझ्या माझ्या
घरासाठी
मी एक
नावही
ठरवलंय.
येशील ना ?

विशाल..                       

माय ...

*************************************** 
कधीमधी उगाचच वाटत राहतं,
आपणही आभाळ व्हायला हवं होतं..
मायच्या फाटक्या नशीबावर,
फाटकं का होईना..
पांघरुण व्हायला हवं होतं.

पापणी होऊन अलगद,
तिच्या आसवांना झेलायला हवं होतं..
तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवुन का होईना ..
भरपुर पाझरायला हवं होतं.

तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर,
जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं..
राहुन राहुन मन खंतावतंय,
एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन..
मनसोक्त रडायला हवं होतं.

********************************************

विशाल..

सावली ...

सुर्याची पिल्ले,
पायावर रेंगाळायला लागली..
माझ्याही नकळत माझी,
झोप मग जागायला लागली..
आळसावलेल्या डोळ्यांनी,
आरक्त क्षितीजा न्याहाळ्ली..
आणि अलगद,
…तुझी आठवण आली.
मग त्या वळणावरची,
पहिली वहिली भेट आठवली.
तुझी पाठमोरी सावली,
वेणीला बसणारे मादक हेलकावे..
तेव्हाही साक्ष होती..
सुर्यकिरणांची,
… आरक्त लाली.
आताशा धुसर होवु लागलीय,
क्षितीजा अन तिची आरक्तताही,
मात्र अजुनही खुणावतेय…
तिथेच रेंगाळलेली..
अजुनी तुझी वाट पाहणारी..
… माझी वेडी सावली.
विशाल.

बरे नाही ...

हे असे
पुन्हा, डोकावणे बरे नाही.
चालताना
उगाच, वेडावणे बरे नाही.
मनी दाटले
भाव, लपवणे बरे नाही.
मज स्मरते
ती वाट, थबकणे बरे नाही.
आता तुझे
चोरुन, मज वाचणे बरे नाही.
तु चाल पुढे,
मागे वळुन, उसासणे बरे नाही.
हे माझे तुला
आता, विसरणे सुरु झाले.
तुझे असे
मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही.
विशाल.

सल ...

त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न
कधीचा मनात सलतो आहे,
सलता सलता माझ्या अस्तित्वाला,
अलगद कुरतडतो आहे……!!
त्यांच्या त्या वि़खारी नांग्या,
आणि ते दाहक दंश..
माझ्या जाणीवाही खाल्ल्याहेत,
तोडुन , कुरतडून त्यांनी,
हळु-हळु त्यांचा प्रवास माझ्या,
मनापर्यंत येवुन पोचतो आहे.
त्यांच्या अस्तित्वाचा विचार करताना,
मी माझंच असणं जाळतो आहे,
त्यांना संपविणे आवश्यक आहे..!
कारण पिंजरे लावणे, सापळे ठेवणे..
ही सोय आहे तात्पुरती..
मला मात्र कायम त्यांच्या…
पुढच्या पीढीची चिंता सलते आहे.

(पुर्ण केलेली पहिली कविता, इथुन कवितेचे वेड लागले)
विशाल

का..?

का निद्रेनेही माझ्याशी                                                                                                           
हि प्रतारणा करावी
तु येताच स्वप्नांमध्ये
नेमकी हि जाग यावी…?

माझ्याच मनाने सदा
माझी वंचना करावी
जेंव्हा कधी मी हंसावे
अश्रुंची कास धरावी…?
रातराणी तिही माझ्या
कानात कुजबुजावी
साथ एवढी आपली
जाणिव तिने करावी …?
मिटुनी घेतले ओठ
अडवीले शब्द जरी
हुंदक्यांनी निघण्याची
का करावी तयारी…?
विशाल

तू नसताना ...

तू नसताना मनी दाटती
भाव तुझ्या स्मृतींचे काही
आठवणींचे फुलपाखरु
शुभ्र धुक्यातुन विहरत जाई…
विरहात तुझ्या हा चंद्र रोजचा
तोही भासे प्रिये कळाहिन
खिन्न भासे आकाशगंगा
फिके जाहले सर्व नभांगण…
तू नसता सखे सभोवती
तूझेच केवळ तुझेच भास
या समीराच्या कणाकणातुन
फिरतो आहे तुझाच श्वास…
तू नसताना झोप जागते
वैरीण होवुन मला झुरवते
दिवस चालला कुर्मगतीने
रात्र उसासे टाकीतसे…
उतरेना आता कंठाखाली
घासही सखे तू नसताना
विसरु म्हणता विसरत नाही
आठवण तुझी तू नसताना…
विशाल

अंधारभूल ....

रात्रीची निरव शांतता
अन गोठलेले रान सारे
सुकलेल्या पाचोळ्याचे निश्वास
अन जागतेय रान सारे…
पक्षी आपले पंख पसरतील
पहाटेची मग चाहुल लागेल
सुकलेली कोरफडही
मग नकळत धुंदावेल…
वसंताची चाहुल मग
अंगोपांगी रोमांच फुलवील
रानफुलाचा मग उग्र गंधही
रान सारे बहरुन टाकेल…
अन अंधाराच्या राज्याला
फुटतील काजव्यांचे डोळे
होइल जागे हळु हळु मग
रान सारे काजळलेले…
मंद समीराची धुंद फुंकर
अंधारभुल मग होईल धुसर
अंधाराच्या रानाला फुटतील
प्रकाशाचे कोवळे अंकुर…
   विशाल

मर्म ...

भडकलेल्या चितेला
कधी कुणी विचारलंय
……..प्रिये तुझी जात काय?
तेजाळणार्‍या तिच्या ज्योतीला
कधी कुणी विचारलंय
………सखे तुझा धर्म काय?
न टळणार्‍या मृत्युला का
कधी कुणी विचारलंय
………बंधो, तुझं कर्म काय?
हेच एकमेव सत्य आहे..
सत्याला कधी कुणी विचारलंय
……….गड्या रे, तुझं मर्म काय?
  विशाल.

चाहुल

  पानांची कुजबुज कानी आली
त्यांनीही माझी प्रिया पाहिली
रातराणी मम कानी वदली
तिला सुखाची चाहुल लागली
प्राजक्त अंगणी फुलुनी आले
मनी मानसी बहर उमलले
हिरव्या गवतात फुल एकले
त्यानेही तिचे गीत ऐकले
क्षितीजी इंद्रधनुष्य लाजले
डोळे जेव्हा तिचे पाहीले
अधीर लाजर्‍या डोळ्यांमधले
मौन अलगद ओठी आले
आता सारे द्वैत निमाले
गाणे माझे सुगंधी झाले
   विशाल

भारतीय ...

हे जळणं आता रोजचंच आहे
बंदुकीच्या गोळीशी आमचं
नातं फार जवळचं आहे
बंदुक माझ्याकडेही आहे
पण चापावर बोटच येत नाही
मी अगदी शांत आहे
……….कारण मी भारतीय आहे
मी कधीचा शांतता मागतोय
ते मात्र आर. डी. एक्स. देताहेत,
आणि देताहेत
निष्प्राण, जळलेली, तुटलेली
माझ्याच स्वप्नांची, आकांक्षाची प्रेते
पण मी शांत आहे
………..कारण मी भारतीय आहे
त्यांचा जोर वाढतोय
माझा भारत कधीचा जळतोय
ते निर्धास्त आहेत
पुन्हा पुन्हा नव्या जोमाने
बापुंच्या कन्येवर बलात्कार करताहेत
त्यांना माहितीये मी शांत आहे
……….कारण मी भारतीय आहे
खबरदार..
माझा अंत पाहु नका
मी जळेन तुमच्या वणव्यात
पण उरेन मागे तरीही
ठिणगी बनुन..
तुम्हाला संपवायला
ती एकच ठिणगी पुरेशी आहे.
कारण..
विसरताय तुम्ही..
वरवर शांत भासत असलो
तरी अखेर…मी भारतीय आहे.
   विशाल

गणित

कधी शब्द ते वत्सल
कधी प्रहार झेलायाचे
कधी ओंजारणे स्नेहाळ
कधी आघात सोसाट्याचे

मनात असते कायम
 भय आंधळ्या डोहाचे
 अंधारभुल होते धुसर
 सुसाट वारे दु:खाचे

येते नभा पल्याडुन
बोलावणे कधी सौख्याचे
कधी कोसळणे आकाश
ओझे ते अनपेक्षिततेचे

कोवळ्या अन किरणांतुनी
ओघळणे कधी सुर्याचे
रखरखाट कुठे तप्तसा
हे जगणे असंतुलनाचे

मी शोधतो वाट माझी
सोडवीत गुंते रस्त्यांचे
सुटले नाही कधीही
मज गणित आयुष्याचे

विशाल

प्राजक्त

झुकली पापणी अन
एकवटला देह सारा
मौन बरसला प्राजक्त
………..मी वेचलाच नाही!


चुंबितो मातीस काळ्या
धुंद आषाढ हिरवा
मुग्ध मोहरला प्राजक्त
………..मी ऐकलाच नाही!


भेदुन गंधाळ धरती
डोकावी हिरवी पाती
ओघळला सवे प्राजक्त
………..मी पेललाच नाही!


संन्यस्त माळ लावतो
ध्यान उन्ह सावल्यांचे
मुक कोसळला प्राजक्त
………..मी झेललाच नाही!


दंवबिंदुंचे हळवे स्पंदन
पालवीचे हिरवे रुदन
रेंगाळला स्तब्ध प्राजक्त
………..मी माळलाच नाही!


 विशाल
 

सावळा

सावळ्याची तनु सावळी
सावळीच सावली
का न मी झाले सावळी ?
राधा खंतावली 
सावळ्याच्या मुरलीसवे
सुर ही सावळे
‘काय माझे झाले असे हे’
राधेला ना कळे

गंधावली गवळण वेडी
रास सावळा खेळी
सावळ्याची प्रीत मनी अन
सावळा जळी स्थळी

पैलतीरी सावली सावळी
राधिके साद घाली
गेली वेडावुनी गोपिका
बासरी धुंदावली

प्रीत सावळी, भाव सावळा
श्याम तो सावळा
सुखाची चाहुल सावळी
जग राधे सावळा
विशाल

Thursday, July 8, 2010

‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन

‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :

 “मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं !

काय घडत होतं ?

हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.

काय मोडणार होतं ?

 हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅंझीनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली. घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते.

अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते.

कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.

भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता

त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.

तव जननी-ह्रद विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी

तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.

तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं 

‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला । सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी

पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.

भू विरह कसा सतत साहू या पुढती । दशदिशा तमोमय होती

तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.

गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे जरि
उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. 
ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.

ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा

राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.

भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.

तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।। 

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. 
असं वाटून ते म्हणतात-

या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ? 

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, 
आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –

तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे 

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल.
पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.

कथिल हे अगस्तिस आता । रे 

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू. मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !

साभार – स्वरूपयोग

साभार – संदर्भ : www.savarkar.org

कबीर – सत्याचा आरसा

संत कबीर …., हा माणुस मला नेहमीच कोड्यात पाडत आलेला आहे. त्याच्या प्रत्येक दोह्यातून इतके वेगवेगळे अर्थ निघतात किं आपण अचंभित होवून जातो. जगणं शिकवणारा, जगणं समृद्ध करणारा हा माणुस.
काही दिवसांपुर्वी श्री. राहुल देशपांडे यांच्या आवाजाने नटलेला “कबीर बानी” नावाचा सुंदर अल्बम बाजारात आला आहे. त्या संदर्भाने www.mimarathi.net  या मराठी संस्थळाचे चालक-मालक श्री. राजे उर्फ़ राज जैन यांनी मी मराठीवर एक सुंदर लेख लिहीला होता. त्यात कबिराचे काही दोहे त्यांनी अर्थासकट दिले आहेत. त्याच्या प्रतिसादातही काही रसिक वाचकांनी काही अतिशय सुंदर दोहे उद्धृत केले आहेत. ते त्यांच्या (राजे आणि रसिक वाचक) परवानगीने जसेच्या तसे इथे प्रकाशित करतो आहे.

राहुल देशपांडेंचा “कबीर बानी” कुणाला हवा असल्यास मी मराठीवर विक्रीसाठी (ऒनलाईन) उपलब्ध आहे. इच्छुकांनी खालील दुव्यावर टिचकी मारुन पाहायला हरकत नाही.

मीम वरील राजेंचा मुळ लेख

कबीर बानी : म्युझिक फ़ॊर सोल (ऒनलाईन खरेदी)

लेखक : श्री. राज जैन

१४ जून म्हणजे संत कबीर ह्यांचा जन्म दिवस.
ह्यांच्या बदल मला जास्त काही माहिती नाही आहे पण.. ह्यांची व माझी ओळख ही अशीच त्यांच्या दोहयातून होत गेली व हा संत म्हणण्यापेक्षा कवी कधी मनात घर करुन बसला ते कळलेच नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचे मर्म त्यांनी व्यक्त करुन दाखवले.
चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥
माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥
माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥
तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥
गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥
सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥
साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥
धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥
कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥
माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥
रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥
दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥
बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥
साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय।
सार-सार को गहि रहै थोथा देई उडाय॥
साँई इतना दीजिए जामें कुटुंब समाय ।
मैं भी भूखा ना रहूँ साधु न भुखा जाय॥
जो तोको काँटा बुवै ताहि बोव तू फूल।
तोहि फूल को फूल है वाको है तिरसुल॥
उठा बगुला प्रेम का तिनका चढ़ा अकास।
तिनका तिनके से मिला तिन का तिन के पास॥
सात समंदर की मसि करौं लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं हरि गुण लिखा न जाइ॥
साधू गाँठ न बाँधई उदर समाता लेय।
आगे पाछे हरी खड़े जब माँगे तब देय॥
काही निवडक दोहे व त्यांचा मला समजलेला अर्थ.
चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

वाह !
इच्छा, लोभ हे सगळे माती आहे. सगळा जे सगळे रामायण-महाभारत घडते त्याच्या मूळामध्ये हा लोभच आहे.
पण ज्या मनात मध्ये चिंता समाप्त होते तेथे मग कसलीच चिंता राहत नाही मन एकदम निश्चिंत राहते..
व ज्याला काहिच इच्छा नाही, लोभ नाही व चिंता नाही तोच खरा शहेनशाह ! तोच खरा राजा !
माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माझे सर्वात आवडता दोहा आहे हा.
जे पेराल तेच उगवेल. जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल.
कोणीच काळाच्या वरती नाही सर्व शक्तीमान तो काळ आहे.
आज तु राजा आहेस तर तो काळ तुला रंक देखील करु शकतो.
तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

कोणाला कधीच छोटे समजू नये व त्यास त्रास देऊ नये, त्याच्या नियतीमुळे तो तेथे आहे,
जर त्याचे दिवस फिरले तर तो तुमच्यावर देखील भारी पडू शकेल, घमंड कधीच नको.
सर्वांना आदर द्या.
सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥


          गरज सरो वैद्य मरो अशी जर मानसिकता जर ठेवली तर वाईट काळामध्ये तुम्हाला कोणीच मदत   
          करणार नाही. तेव्हा आपल्या चांगल्या काळामध्ये लोकांना मदत करत रहा जेणे करुन तुमच्या वाईट
          काळामध्ये कोणी ना कोणि तरी असेल जे तुम्हाला साथ देतील. आपल्या यशाच्या आनंदात मग्न राहून
          ज्यांच्यामुळे आपण येथे पोहचलो आहे त्यांना विसरु नका

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

 

देवा, मला एवढं मिळू दे की ज्यामध्ये माझ्या गरजापुर्ण होतील व घरी येणारा अगंतूकाची मी निट सेवा करु शकेन. अती देऊ नकोस ज्यामुळे मला घमंड होईल व कमी देखील नको देऊ की ज्यामुळे माझ्या घरी आलेल्या अगंतुकाची मी सेवा ना करु शकेन.

अर्धवट यांचा प्रतिसाद

मुल्ला बनके बांग पुकारे, वो क्या साहीब बहीरा हैं।
चुंटी के पग घुंगरू बांधे, वो भी अल्ला सुनता हैं॥

सोना यांचा प्रतिसाद


गुरु गोविंद दोउ खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो मिलाय ॥
देव आणि गुरू दोघे एकावेळी समोर उभे राहिले
कोणाच्या प्रथम पाया पडावे हा प्रश्न पडला
तेव्हा गुरूचे प्रथम स्मरण केले कारण
त्यानेच देव दाखवायला मदत केली.

पराग यांचा प्रतिसाद…

अबिदा आणि जगजित सिंग यांच्या आवाजतिल कबिराचे दोहे ऐकण्यासारखे आहेन . ते ऐकले कि शांत वाटते

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना, तो मुझसे बुरा न कोय
लालि मेरे लाल कि, जित देखु तित लाल
लालि देखन मै गयि, मै भि हो गयि लाल
सुखिया सब संसार है , खाये ओर सोये
दुखिया दास कबिर है, जागे ओर रोये

यावर पिडांकाकांनी मनापासुन दिलेला प्रतिसाद….. (जो कुणालाही पटेल)
 
by पिवळा डांबिस – 14/06/2010 – 07:13

राजे, तुम्ही आमच्या मर्मबंधातल्या ठेवीलाच हात घातलात की हो!!!
आज एक गुपित सांगतो,
आमचं माध्यमिक (८-१०) आणि हुच्च माध्यमिक (११-१२) वीला हिन्दी होतं! तेहि हायर हिन्दी!!!
कॅन यु रियली बिलिव्ह दॅट!!!
हास्य
त्या वेळेस एका तिवारीशास्त्रींच्या पायाशी बसून बरंच जमेल तसं अध्ययन केलं! तुलसीदास, सूरदास, कबीर आणि इतरही!!!
लेकिन दिल चुरा लिया तो कबीरजीने!!!!
(इसलिये महारास्ट्र के लोग हमें माफ कर दें — जयाबाईंच्या माडीवर शिकलेला डायवलॉक!!!)
हास्य
असो,
तुम्ही इथे कबिराचे दोहे देताय, मस्त गोष्ट आहे!
पण एक करा….
त्यांचा अर्थ द्यायची गुस्ताखी करू नका….
कबिराचे दोहे, ते तुम्हीच म्हटलंत तसेच आहेत, आपापल्या मनाचा आरसा!!!
आम्ही तुम्हाला आमचे मित्र मानतो म्हणून हे स्पष्ट लिहीलं, राग नसावा!!
कबिराच्याच शब्दांत सांगायचं तर…
“ऐसी दोस्ती न कीजिये, जैसे खीरा(काकडी)ने कीन
बाहरसे तो मिले हुये, भीतर फांके तीन!!!”
हास्य

आपला,
पिडांआजोबा.

(नोट टू मायसेल्फः कधीतरी एकदा कबिराचे दोहे आणि आयुष्यात आलेले अनुभव यावर लिहायला पाहिजे!! wink )
 
अजुनही जसजसे वाचकांकडुन दोहे जमा होत जातील तसे ते इथे ऎड करत जाईन. :-) 
 
राजे, हा सुंदर लेख शेअर केल्याबद्दल आणि माझ्या ब्लॊगवर टाकायची अनुमती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेल्या संत कबीराच्या काही रचना (यु ट्युब दुवे) इथे ऐका-पाहा.
 
विशाल कुलकर्णी.

आज़ जाने की जि़द ना करो…

राम राम मंडळी,
आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल!

फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं! बर्‍याच दिवसापासून या गाण्यावर दोन शब्द लिहायचा बेत होता, आज जरा सवड मिळाली.


आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..

आज़ जा़ने की जि़द ना करो.. !

क्या बात है, एक अतिशय शांत स्वभावाचं, परंतु तेवढंच उत्कट गाणं! भावनेचा, स्वरांचा ओलावाही तेवढाच उत्कट! यमन रागाचं हे एक वेगळंच रूप!

मंडळी, आजपर्यंत हा यमन किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर यावा? मला तर अनेकदा प्रश्न पडतो की या रागाचं नक्की पोटेन्शियल तरी किती आहे?! ‘जिया ले गयो जी मोरा सावरीया’, ‘जा रे बदरा बैरी जा’ मधला अवखळ यमन, ‘समाधी साधन’ मधला सात्विक यमन, ‘जेथे सागरा धरणी मिळते’ मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, ‘दैवजात दु:खे भरता’ मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि ‘रंजिश ही सही’ किंवा ‘आज़ जा़ने की जि़द ना करो’ सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! किती, रुपं तरी किती आहेत या यमनची?! गाणं कुठल्याही अर्थाने असो, यमन प्रत्येक गाण्याच्या शब्दांना त्याच्या अलौकिक सुरावटीचे चार चांद लावल्यावाचून रहात नाही!

आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..


‘यू ही पेहेलू मे बैठे रहो..’ मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! ‘पेहेलू’ या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! ‘कानडाउ विठ्ठलू..’ आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! अहो शेवटी समुद्र हा सगळा एकच असतो हो, फक्त त्याची नांव वेगवेगळी असतात! Smile
‘बैठे रहो’ हे शब्द किती सुंदररित्या ऑफबिट टाकले आहेत!

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे
ऐसी बाते किया ना करो!
आज़ जा़ने की जि़द ना करो,


हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!!
ओहोहो! खल्लास…
‘हाये’ मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा ‘हाये’ हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! छ्या, ऐकूनच बेचैन व्हायला होतं! माझ्या मते इथे या गाण्याची इंटेन्सिटी आणि डेप्थ समजते!
‘हम तो लुट जाएंगे..’ मधल्या ‘हम’ वरची जागा पहा!

‘मर जाएंगे’, ‘लुट जाएंगे’ मधील ‘जाएंगे’ या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! गंधारावर किती खानदानी अदबशीरपणे ‘मर जाएंगे’, ‘लुट जाएंगे’ हे शब्द येतात! मंडळी, हा खास यमनातला गंधार बरं का! अगदी सुरेल तंबोर्‍यातून ऐकू येणारा, गळ्यातला गंधार म्हणतात ना, तो गंधार! आता काय सांगू तुम्हाला? अहो या एका गंधारात सगळा यमन दिसतो हो! यमनाचं यमनपण आणि गाण्याचं गाणंपण सिद्ध करणारा गंधार!
‘हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे’ ची सुरावट काळीज घायळ करते! क्या केहेने.. साला आपली तर या सुरावटीवर जान निछावर!

‘ऐसी बाते किया ना करो..’!

वा वा! ‘किया’ या शब्दावरची जागा पाहा. ‘करो’ हा शब्द कसा ठेवलाय पाहा फंरिदाबाईने! सुंदर..!
खरंच कमाल आहे या फ़रिदा खानुमची. या बाईच्या गाण्यात किती जिवंतपणा आहे, किती आर्जव आहे! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! आमच्या हिंदुस्थानी रागसंगीतात आवाज नुसताच छान आणि सुरेख असून चालत नाही तर तो तेवढाच जवारीदारही असावा लागतो. फंरिदाबाईचा आवाज असाच अगदी जवारीदार आहे. तंबोरादेखील असाच जवारीदार असला पाहिजे तरच तो सुरेल बोलतो आणि हीच तर आपल्या रागसंगीताची खासियत आहे मंडळी! सुरेलतेबरोबरच, बाईच उर्दूचे उच्चार देखील किती स्वच्छ आहेत! क्या बात है…!

असो, तर मंडळी असं हे दिल खलास करणारं गाणं! बरेच दिवस यावर लिहीन लिहीन म्हणत होतो, अखेर आज टाईम गावला! एखादं गाणं जमून जातं म्हणतात ना, तसं हे गाणं जमलं आहे. अनेक वाद्यांचा ताफा नाही, की कुठलं मोठं ऑर्केस्ट्रेशन नाही! उतम शब्द, साधी पेटी-तबल्याची साथसंगत, यमनसारखा राग आणि फ़रिदाबाईची गायकी, एवढ्यावरच हे गाणं उभं आहे! मी जेव्हा ‘फ़रिदाबाईची गायकी’ हे शब्द वापरतो तेव्हा मला नेमकं काय म्हणायचं आहे हे कदाचित हिंदुस्थानी रागसंगीतात जाणणारी मंडळी अधिक चांगल्या रितीने समजू शकतील! बाईने दिपचंदी सारख्या ऑड तालाचं वजन काय छान सांभाळलंय! हार्मिनियमचं कॉर्डिंगही खासच आहे. तबलजीनेही अगदी समजून अत्यंत समर्पक आणि सुरेल ठेका धरला आहे! जियो…!
साला, या गाण्याचा माहोलच एकंदरीत फार सुरेख आहे!

आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे, तंबोरा जुळतो आहे, सारंगी त्याच्याशी मिळतंजुळतं घ्यायच्या प्रयत्नात आहे, तबल्याच्या सुरांची आस तंबोर्‍याच्या स्वराशी एकरूप होऊ पाहते आहे आणि काळजावर अक्षरश: कट्यार चालवणारी अशी एखादी ललना मादक आणि बेभान स्वरात,

‘आज़ जाने की जि़द ना करो..’ असं म्हणते आहे!
क्या बात है…!

–तात्या अभ्यंकर.

अतरंग…

जैपालभौंची ही सुंदर कवित वाचल्यावर आम्हाला राहवले नाही, अंतरंगात गडबड सुरू झाली अन इडंबन जलमलं !

पावसाचं खाणं
मातीत जाणं
पोटात गडगड होणं
अतरंगी ....

ओला टॉवेल
पिवळी नक्षी
कायमच्या साक्षी
अतरंगी .....

गच्च दरवाजे
ओली थरथर
अधिरलेले उदर
अतरंगी ......

उठे उधाण
सरे देहभान
पोटात तुफान
अतरंगी ......

झाकल्या खुणा
का उघडता पुन्हा
घडला काय गुन्हा?
अतरंगी ......

नवईडंबनकार ईरसाल

(बस्स्स नकोस आता)

आमचं पण रनिंग बिटवीन द विकेट….. Wink
अर्थात आमची प्रेरणा : इथे आणि इथे
कवितेमागे धावणं
थांबवलं आजपासुन..
कारण ती सुचतच नाही मूळी
आणि ट ला ट संयोगाने आलीच..
तरी व्याकरणाचा गंध नाही मला
मग एवढी खर्डेघाशी कशाला?
मला इतकं चिडवून, रडवून
(डोक्यावरले केस)
उपटून उपटून
जमलीस तर काय जमलीस?
किती आणि कसं सांगू?
कालपर्यंत होती तितकी, आज
नाहीये आता खाज?
विडंबनांमागे धावणं…
सुरू आजपासून !

‘नवइडंबनकार इरसाल खोटे’

‘म’ वाली ….

बरेच दिवस शांत होतो. पण सद्ध्या कौतुकराव शिरोडकरांनी लावलेला धडाका बघून आम्हालाही सुरसुरी आली. कौतुकरावांच्याच http://www.maayboli.com/node/14055 या सुंदर कवितेला आमचे हे विडंबन सादर समर्पित.

’बाई’ ने पुरावे खुले मांडलेले…
‘साहेबां’शी दुरावे किती वाढलेले…,

पिपासू नेत्यांचे घसे कोरडे अन…
खंड भुखंडांचे वाया चाललेले ….,

वासना धनाची प्रभागास जाळी ….
चरे नित्य आमदार निधीस लाभलेले,

दिसे राजधानीची कवाडे मनाशी…
रडतात पुढारी, तिकीट कापलेले,

द्यावे..? घ्यावे..? कसे सिद्ध व्हावे..?
सारेच प्रश्न जनपथी टांगलेले…,

उठे हात दोन्ही, ” कुणी होय वाली?”
मन – मोहन सोनिया चरणी गुंतलेले …. !

(आता जुना झालेला) ईडंबनकार ईरसाल खोटे

खरेसाहेब…माफ़ करा : ४ : दिवस असे की …


ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!
सावकारांच्या कर्जाखाली बुडतो…
आयुष्याला तारण ठेवूनी देतो,
या जगण्याचे कारण उमगत नाही..,
या जगणे म्हणवत नाही…..

व्याजाचे हे एकसंधसे तुकडे…
मम छाताडावर नाचे त्याचे घोडे,
या घोड्याला लगाम शोधत आहे,
परि मजला गवसत नाही…..

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!
मी गरीब की मी दुर्दैवी कमनशिबी…
कर्ज चुकवण्या शोधतो शेकडो सबबी,
दुर्दैवाला हजार टाळू बघतो…
परि ते पिच्छा सोडत नाही…

येतो म्हणताना ओठ कापती थोडे…
तू मिटून घे पिल्लांचे माझ्या डोळे,
देहाचे अन मम, पदराला तुझीया
हे ओझे पेलवत नाही …. !

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!

त्या दुर्दैवी जिवांसाठी काहीही करु न शकणारा एक असहाय्य सामान्य माणुस !
ईशल्या देणेकरी

खरेसाहेब माफ़ करा : ३ : जरा चुकीचे ….

जरा चवीचे.., जरासे बेचव…
जरा चवीचे.., जरासे बेचव, खाऊ काही,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
आला नाही ढेकर तोवर खाऊ काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
पाठ फिरू दे त्यांची नंतर, ओरपू तर्री..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
पर्याय नकोशा बर्गरवर चल शोधू काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

चयापचयाची कशा काळजी, हाण तू दाबून
चयापचयाची कशा काळजी, हाण तू दाबून
रबडी आहे ‘वड्या’च्या नंतर, खाऊ काही…
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

लिंबू असू दे हातामध्ये, रेचक म्हणूनी
लिंबू असू दे हातामध्ये, रेचक म्हणूनी
भूक हावरी, तब्येत खडतर, खाऊ काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही …….

नव-ईडंबनकार ईरसाल ‘खोटे’

‘खरेसाहेब माफ करा : २ : एवढंच ना?

एवढंच ना? विडंबन करू… एवढंच ना?
आमचं हसं, आमचंच हस्सं… , घेऊन कागद एकटेच लिहू,
एवढंच ना?

मक्त्याला कोण? मतल्याला कोण? गझलेला अवघ्या वाचतय कोण?
शब्दाला शब्द, प्राचीला गच्ची, यमकाला यमक जुळवत लिहू,
एवढंच ना?

कवितेला मिटर होतंच कधी? काव्याला व्याकरण होतंच कधी?
शब्दांचे सोस, यमकाचे कोश, तिरकस प्रतिसाद अनुभवत लिहू,
एवढंच ना?

वाचलंत तर द्याल, तुमचीच ‘राय’ , टाळलंत तर टाळाल, आम्हाला काय?
स्वत:च कवि, स्वत:च वाचक, स्वत:च समिक्षक होवून लिहू,
एवढंच ना?

काव्याच्या छंदा, लिहिण्याचा धंदा, लिहीत राहू कुणी वंदा वा निंदा,
काव्याच्या छंदा, कवितेचा धंदा, विडंबन करून जगतोय बंदा,
विडंबन खरे, विडंबन बरे, सगळ्यांच्या खोड्या काढीत लिहू,
एवढंच ना?

नव-ईडंबनकार ईरसाल ‘खोटे’

खरेसाहेब…., माफ़ करा !

(आमी बी पाडलं….  )
आता पुन्हा
कुणीतरी विडंबन करणार ….
आता पुन्हा, आम्ही डोक्यावर हात मारणार
मग आम्ही संगणकासमोर बसणार
मग कुणीतरी विपुत खरड टाकणार
मग आम्ही अजुनच वैतागणार
तरिही खरडी कमी नाही होणार
काय रेsssss देवा …..

विडंबन बघुन आम्ही पेटणार
उगाचच खोड्या काढता, ओरडणार
गुलमोहरावर नवा कप्पा मागणार
मग अ‍ॅडमिन नाही म्हणणार
मग आम्हीही खरडी वाढवणार
अ‍ॅडमिनच्या नावाने खडे फोडणार
तरिही अ‍ॅडमिन नाही ऐकणार
पुन्हा विडंबनाचा मुड नसणार
मग प्रतिसाद देणे बंद करणार
मग आम्हाला अनुल्लेखवाले म्हणणार
पुन्हा आमच्यावर चर्चा होणार …
पुन्हा कुणीतरी विडंबन करणार….
काय रेsssss देवा……

सुरुवातीपासुन माबो चाळायचे ठरवणार
पण ते काही केल्या नाही जमणार
मग एखादी जुनीच कविता टाकणार
मग आमची चोरी पकडली जाणार
परत ते आम्हाला चिडवणार
मग आम्ही कट्ट्यावर परतणार
तिथे तेच तेच चेहरे असणार
मग पुन्हा नवीन विडंबन करणार
काय रे sssss देवा ……

हे असेच चालायचे
विडंबने कालही होती… आजही होताहेत…, उद्याही होणार…!
काय रे देवा …….

(नव इडंबनकार ईरसाल ’खोटे’)

ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?

ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा?
ए आई……,सांग ना SSSSS!

आता गोष्ट नको आम्हाला,
गाण्यातला रस संपला!
लुटुपुटीच्या भातुकलीचा,
आला खुप खुप कंटाळा SSSS!
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा?

नकोच आई मजला,
चॉकलेटचा तो बंगला !
अन बर्फीची ती झाडे,
इथे आहेत, हवी SSSS कुणाला?
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा?

राजपुत्र अन परीराणीच्या,
गोष्टींचा स्टॉकही संपला !
टॉम अँड जेरी, पापायनेही,
बघ जीव; आमचा SSS उबला !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?

चिवचिव करती चिमणपिले,
चोचीतच घास राहीला !
असेल का गं गेला ?
त्यांचाही बाबा टूरSSS ला?
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?

बघ चांदोबा तो रुसला,
चांदण्याही…, बघ धुसफुसल्या !
अंगाई नच रुचे आम्हाला,
आम्हा हवाय बाबा……, थोपटायलाSSSSS !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?

विशाल.

आभाळबाबाची शाळा …

कडाड कड कड कडाड कड
आभाळबाबाची छडी कडकडे
सैरावैरा मग धावत सुटले
छबकडे नभाचे इकडे-तिकडे…..! 
 
नकोच मजला शाळा आता
नकोच अन ते क्लिष्ट धडे
गाऊ गाणी आनंदाची
जाऊ  बाबा भुर गडे ….!

वारा मास्तर शिळ घालती
कवायतींचे  देती धडे
वीजबाई शिस्तीच्या भारी
पाहूनी तया ऊर धडधडे…!

निसर्गसरांचा तास मजेचा
रेखू चित्रे मिळूनी गडे
वीज घालीते गणिते अवघड
ढगबाळा मग येई रडे…!

माय धरित्री वाट पाहते
डोळे तिचे आकाशाकडे
दांडी मारूनी शाळेला मग
ढगबाळ धावे आईकडे…!

माय-पुतांची भेट अनोखी
गंध मायेचा जगी दरवळे
पाऊस आला, पाऊस आला
आनंद पसरे चोहीकडे ….!

ऋतुंमध्ये श्रेष्ठ ऋतुराज “पावसाळा”, त्याच्या आगमनाप्रित्यर्थ पावसात खेळायला आवडणार्‍या प्रत्येक बाळ-गोपाळास या पावसाळ्याच्या खुप खुप शुभेच्छा !

विशाल कुलकर्णी.

त्रिवेणी (तिनोळ्या) - २

बस्स.., नको आता खुप कंटाळा आलाय..
कविता लिहायचा…, खर्डेघाशी करायचा…
एखादी कविता जगुन बघावी म्हणतो…, कस्से?

**********************************************************************

खुप लिहायचो…, खुप वाचायचो…, अगदी भरभरून..!
आजकाल सगळंच बंद, वेळच मिळत नाही बघ….
तुला वाचायला सुरूवात केल्यापासून…., खर्रच, तुझी शप्पथ !

***********************************************************************

तू सुर छेडले की माझी बोटे सळसळायला लागायची…
तुझ्या गळ्यातले अमृत…, नसानसात चैतन्य फुलायचे …
तू गात राहा… माझ्या मात्र सतारीची तार निखळलीय…..!

***********************************************************************

विशाल...